शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

दत्ताची आठवण

दत्तात्रय हेलसकर...
साने गुरुजी कथामालेसाठी आयुष्य समर्पित केलेला जिव्हाळ कार्यकर्ता शिक्षक....
५ सप्टेंबर २०१५ रोजी शिक्षक दिनी कार्यक्रमाच्या तयारीला मोटारसायकलवरून शाळेला जाताना अपघातात जखमी झाला. तीन दिवस मृत्यूशी झुंज देत देत अखेर ८ सप्टेंबर रोजी सकाळी दत्ता अनंताच्या प्रवासाकडे निघून गेला.
चिमण्या पाखरांच्या आनंदासाठी दत्ता मराठवाडाभर वणवण हिंडत राहिला. साने गुरुजींचा वसा -वारसा त्याने आपला श्वास म्हणून जपला - जगला.
कथामालेच्या माध्यमातून दत्तानं असंख्य गणगोत गोळा केलं. सर्व क्षेत्रातील गोतावळा हे त्याचं वैभव होतं.
४५ व्या वर्षीच इतका अफाट पसारा जोडून-सोडून तो गेला. तेव्हा मी अंदमानात असल्यानं त्याला शेवटचं पाहता आलं नाही हे दुर्दैव माझ्या मनात कायम सलत राहील. पण काल परवा आयुष्यात आलेला हा गोड माणूस माझ्या संचिताची समृद्धीच. माझ्यागत कैकांच्या काळजात घर करून आणि तहहयात पोकळी ठेवून दत्ता अकाली गेला.
एकदा अचानक देवगिरीने जाताना सेलूला स्टेशनवर त्यानं आणलेली ठेचा भाकरी ही आयुष्याची अखेरची शिदोरी ठरली.
दत्ताच्या गावी हेलसला गेलो होतो, त्याची ही जुनी आठवण....

दत्तात्रय हेलसकर : एक आठवण
(२०१४)
व्हाट्सपच्या निमंत्रणावरून, तेही ग्रुपवरील, मी संमोहितागत मंठा तालुक्यातील हेलस या गावी दत्तात्रय हेलसकरांच्या बहिणीच्या लग्नाला जाऊन आलो. ४ एप्रिल २०१४, शुक्रवारी. हेलसची माणसं, तिथली माणुसकी न् मानवता जपणारी घरं आणि माणसं इतक्या दूर आल्याचं सार्थकी समाधान पावलं मला. जालना जिल्ह्यातील खेड्यात जाण्याचा हा दुसरा प्रसंग. दहा-पंधरा वर्षापूर्वी हानमंत माळी या माझ्या मित्राला भेटण्यासाठी असाच वेड्यागत मोटार सायकलने गेलो होतो ! परतूर तालुक्यातील रोहिणा या गावाला. पण हानमंत माझा जुना मित्र. पंचवीस वर्षापासूनचा. वर्गमित्र. पण दत्ता हा काही जुन्या गणगोतातला दोस्त नाही. अगदी दोनेक वर्षापूर्वी ओळख झालेली, तीही फोनवर. प्रत्यक्ष आम्ही गेल्या डिसेंबरात एकमेकांना पाहिलं-भेटलो!
तरीही निव्वळ ग्रुपवरल्या निमंत्रणानं मी कसा गेलो, ते मलाही कळलं नाही. बायकोला न सांगता हे आणखी विशेष!
दत्ता हा माणूसच और आहे. तो फक्त एक व्यक्ती नाहीय. तर समता, बंधुता, करुणा या आंतरिक मूल्यांच्या शोधपूर्तीसाठी अव्याहत, अथक, अहर्निश धडपडणारी मानवी अस्वस्थता जगणारी प्रवृत्ती आहे तो. डिसेंबरात आम्ही नांदेडला भेटलो आणि जन्मोजन्मीचं नातं असल्यागत गुंतून गेलो आम्ही. त्याचं बोलणं, शब्दाशब्दातून झिरपणारी मुलांच्या (सर्वसामान्यांच्या, पोटच्या नव्हे!) कल्याणासाठीची तळमळ, तीही कुठल्याही, कसल्याही परताव्याची आस न ठेवता, मला नुसती भावलीच नाही तर या प्रवृत्तीनं भारावून टाकलं मला. या भारावलेपणात गेलो म्हूणून तर हेलसचं माणूसपण पाहता-अनुभवता आलं.
आदल्या रात्री झोपता झोपता नेट चालू करून बघितलं सहज. तर धाडधाड मेसेजचा धडाका! अचानक पुराच्या पाण्याचा लोंढा अंगावर यावा तसा. वाट्सपमध्ये ऊठसुठ तोंड खुपसून बसायची सवय नाही न् आवड-सवडपण नाही. त्यामुळे असा लोंढा परतवून लावायची सोय माझ्यापुरती करून घेतलीय मी. मानभावी वाटेलही कदाचित. काय करणार तरी मग? उगीच कामधाम नसणारी आपली मित्रमंडळी इकडचं तिकडे न तिकडचं इकडं कॉपी पेस्ट करण्यात प्रचंड मशगूल आणि तरबेज असतात! काही सन्माननीय अपवाद असतात म्हणा, आहेतही! मी आपलं हिरवं दिसलं की ओपन करतो न् पुढे सरकतो. बस्स. काय काय वाचायचं? मोठं दिव्य असतं ते. वर्षभरापूर्वीचं ही मंडळी ताजं म्हणून पाठवतात. ते शिळं होऊन कुबट झालंय याचा त्यांना मागमूसही नसतो. वैताग नुसता. मी आपलं पाट्या टाकत होतो, की दत्तानं पाठवलेली पत्रिका झूम करून बघितली सहज. तितक्यात एकाचा ' विवाहास आमच्या शुभेच्छा ' असा संदेश धडकला. क्षणभर वाटलं, मित्र बहिणीच्या लग्नाचं निमंत्रण देतोय, न् तुम्ही तोंडदेखलं मेसेज काय करताय लेको? पेक्षा जायला हवं आपण!
झालं, निर्णय झाला. मग दत्ताला विचारलं, मेसेज करून हं! हेलसला कसं यायचं? सविस्तर मार्ग कळल्यावर हायकोर्ट एक्सप्रेसनं जायचं पक्कं ठरवून झोपी गेलो.
डोक्यात हेलस असल्यानं न् धसकीनं (की उत्कंठेनं?) पहाटे तीनलाच जाग आली. एवढ्या पहाटे काय करायचं म्हणून पुन्हा आडवा झालो, ते सहाला डोळा उघडला. पूर्वी शाळेला झेंड्याला जाताना असंच व्हायचं. आता?
गडबडीनं सगळं आवरून तरोडा नाक्याला येऊन थांबलो. मिळेल त्या वाहनानं जायचं पण जायचंच, या निश्चयानं. नशीब बघा, एरव्ही जिथे जायचं तिकडची गाडी हमखास मिळत नाही. पण चक्क इनोव्हा कारचा लाभ घडला. थेट मंठ्यापर्यंत. मस्त एसीत जुनी कर्णप्रसन्न गाणी ऐकत साडेआठलाच मंठा गाठलं. दत्ताला सांगितलं, मंठ्यात पोचलोय. तुमचं चालूद्या. मी वेळेवर पोचतो.
मला चांगलं चुंगलं खायची भारी हौस! तिथं चौकशी केली, चांगली खिचडी कुठं मिळते म्हणून! एकदोघांनी सांगितलेल्या क्रांती हॉटेलमध्ये गरमगरम खिचडी भजे चोपले. थोडं टंगऴमंगळ केलं न् डुगडुगीनं हेलस फाट्यावर उतरलो. तिथून गाव साधारण एकदीड किलोमीटर असावं. लग्नाच्या बॅण्डचा आवाज कानावर येत होता. छान मराठी गाणं वाजत होतं. मग काय त्या गाण्याच्या धुंदीत-मस्तीत आपली तुकाराम एक्सप्रेस निघाली.
गाव जवळ आलं तसं शाळा स्पष्ट होऊ लागली. शाळा म्हटलं की माझं पाऊल पुढे वळत नाही. पण म्हटलं, आधी घरी जाऊ. दत्ताला आनंद वाटेल. घर गावाच्या दुस-या टोकाला!
पुसत पुसत गावाची परिक्रमाच केली. जुनी माळवदाची घरं. जवळपास काटकोनातले रस्ते. नवा सिमेंटचा स्पर्श झाला तरी हटवादीपणानं चिटकून राहिलेलं जुनं उदासपण. काही घरं मात्र खानदानी. नव्या पिढीनं बापजाद्यांचं वैभव टिकवून ठेवल्याची साक्ष देणारी! रस्त्याच्या कडेला लागूनच लाकडी नक्षीदार खांबावर आपलं मोठेपण तोलून धरलेली घरं. तीन चार फुटाचा ओटा न् मागे सुबक कारागिरीनं सजलेले दरवाजे. सगळ्या गावात असणारे अडथळेही रस्त्यात! कुठं बैलगाडी, कुठं मोटार सायकल. पाण्याचं दुर्भिक्ष असूनही रस्त्यावर वाहणारं पाणी. सगळं आपल्यासारखंच. पण माणसं मोठी प्रेमळ. अगत्य असलेली. विचारलं की सविस्तर सांगणारी.
गावाच्या उत्तरेस कालिका माता मंदिरात लग्नाची गडबड सुरू होती. पोरंसोरं इकडून तिकडं हुंदडतायत. माझ्या परिचयाचं कोणीच नाही. दत्ता पूजेला बसलेला. प्रसाद नावाच्या नवोदयला सिलेक्ट झालेल्या मुलाशी दोस्ती केली. त्यानं शाळेची ब्ल्यू प्रिंटच काढली की. लग्न साडेबाराला. आता तर दहा झालेत. मग सरळ पूर्वेला नदी होती आटलेली. नदी कसली लहान ओहळ तो. तिकडे मोर्चा वळवला, दाट सावलीचं झाड बघून गवतावर पसरलो मग. परन्या वापस मंदिरात आल्या तशा बॅण्डच्या वाढल्या आवाजानं जाग आली.
लग्न झालं. दत्तानं मंदिराचे अध्यक्ष तळणीकरांकडून श्रीफळ देऊन मानपान केला माझा. (पण श्रीफळ विसरलो तिथंच). पंक्तीतल्या जेवणाचा आनंद मात्र मनमुराद घेता आला नाही. पण गावक-यांशी बोलून अधिक पोट भरलं. मंदिराचे ट्रस्टी तिथं लग्नाचा सगळा भार उचलतात. किती ही मोठी लोकसेवा. दत्ता आणि त्यांच्या मित्रांनी गतवर्षी मंदिराचा भक्कम पक्का मंडप उभारलाय. गावासाठी खूप जीव लावतात सारे. पण अजूनही मंदिरात आरती सुरू झाली की अंगात येतं लोकांच्या. माझ्या नजरेतल्या प्रश्नाला दत्ताचं उत्तर, हे अजून करायचं राहिलंय. गंमत म्हणजे, अंगात येणारे बव्हंशी सुशिक्षित न् सरकारी नोकरदार. दत्ताची खंत आणि तळमळ अनुभवली. इतक्या दुरून आलो म्हणून तुकारामाची सोबत दिली सेलूपर्यंत. तिथून तपोवन हुकल्यानं एस्टीनं परभणी न् मग दीक्षाभूमी एक्सप्रेसनं रात्री दहाला नांदेड. पांडू घ्यायला आला म्हणून घर लवकर जवळ आलं.

मात्र एवढी दगदग झाली तरी, दत्ताच्या पत्नीचं अगत्य, नदीकाठावर सद्य परिस्थितीवर अभ्यासपूर्ण मत मांडणारा संदीप, गावाच्या लळ्यानं अजूनही शहराचा न झालेला दत्ता आठवत राहिला न् थकवा पार पळून गेला..
अशा अनाहूत ओढीनं अजूनही आपण आपलं ताजेपण जगू शकतो हा आनंद खूप वर्षांनी पावला.. कारण दत्ता हेलसकर... त्याचं मानव्यासाठी झिजणं...

(हे लेखन दत्तानं वाचलं होतं.)

शनिवार, २८ मे, २०२२

काळीजकुपीतील गोष्ट...

साहेबांच्या सहवासातील एक आठवण...



शहाण्णव सालची गोष्ट आहे. मी शिक्षक असतानाची. तेव्हा आदरणीय कळमकर साहेब एमपीएसपीला प्रकल्प उपसंचालक होते. एमपीएसपीकडून प्रकाशित होणाऱ्या 'शिक्षक मित्र' मासिकासाठी नांदेड जिल्ह्यातील हरसद येथील प्राथमिक शाळेच्या उपक्रमाचं लेखन घेऊन मी मुंबईला गेलो होतो.  लोहा तालुक्यातील हरसद येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवा कांबळे हे विद्यार्थी उपस्थिती वाढावी यासाठी दररोज प्रभात दिंडी काढायचे. त्या उपक्रमाचं ते लेखन होतं.
एके दिवशी तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉ गोविंद नांदेडे साहेब मला अचानक म्हणाले, मुंबईला जातोस का? मी लगेच 'हो सर' म्हणालो. कारण सरांना नकार देण्याच्या परिणामाचा तेव्हा ताजा अनुभव होता!
पुन्हा म्हणाले, कधी गेला होतास का? मी म्हणालो, नाही. पुन्हा प्रश्न, मग कसा जातोस? मी उत्तरलो, कसाही.
मग लेखाधिकारी वडकुते साहेबांना बारीक सारीक तपशील विचारून संध्याकाळच्या रेल्वेने मुंबईला निघालो. 
व्हीटीला ( आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) सहा वाजता उतरलो आणि पायी दिंडी सुरू केली. व्हीटी वरून सरळ पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी गाठून, चर्नी रोडच्या फुटपाथवरून महाकाय शहराचं दडपून टाकणारं अजस्त्र रूप न्याहाळत निघालो. वीसेक मिनिटांत जवाहर बालभवन दिसलं आणि जीव सुखावला. गिरगाव चौपाटीवर महापालिकेच्या स्वच्छतागृहात अंघोळ केली. मुंबई शहराचं इतकं कौतुक ऐकलं होतं की, अंघोळीला जाताना ब्रिफकेस बाथरूममध्ये घेऊन गेलो होतो.

साधारण नऊ वाजता मी बालभवनाच्या पायरीला होतो. प्रकल्प संचालक कार्यालयाचं कुलूपही उघडलं नव्हतं. मी रस्त्यावरील रहदारीचा आणि समुद्रावरून येणाऱ्या दमट वाऱ्याचा आनंद घेत बाजूला थांबून होतो. साडेनऊ वाजता शिपाई आले. बरोब्बर दहा वाजता साहेब आले. थेट कार्यालयात गेले. मीही लगेच गेलो.
साहेबांना परिचय दिला. समोरच्या खुर्चीकडे निर्देश करत बस म्हणाले. मी जरा अवघडलो. इथे साधं केंद्रप्रमुख आले तर खुर्चीत बसण्याची हिंमत नव्हती आणि थेट राज्याचे उपसंचालक आपणाला बसायला सांगताहेत! खरं सांगायचं तर मी संकोचलोच. साहेब पुन्हा म्हणाले, अरे बस ना.  मग धाडस करून बसलो अखेर समोर.
साहेबांनी चहा घेतोस का असं विचारत चहा मागवला पण. समोर बसणं एकवेळ ठीक होतं. पण सोबत चहा घ्यायचा म्हणजे तर माझ्यासाठी खूप होतं. चहा घेता घेता साहेब माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलत राहिले. नांदेडे साहेबांची आणि नांदेडची ख्यालीखुशाली विचारत राहिले. 
मी सोबत आणलेलं लेखनाचं पाकीट साहेबांना दिलं आणि मी येऊ का साहेब म्हणून निघण्याची परवानगी विचारली. तर म्हणाले, अरे थांब थोडं. इतक्या लांबून आलास तर साहेबांना भेटून तर जा. साहेब बारा वाजता येतात. भेटलास की जा मग. तेव्हा डॉ संजय चहांदे साहेब प्रकल्प संचालक होते.
माझा नाइलाज झाला. थोडं घुटमळत थांबलो. लगेच साहेब म्हणाले, मुंबईला कधी आला होतास का?
मी: नाही साहेब.
साहेब: मुंबई बघायची का?
मी: हो साहेब.( एकही क्षण न दवडता)
साहेब: मग असं कर, खाली उतरलास की डाव्या बाजूला चालत जा. जवळच बसस्टॉप आहे. तिथून या या नंबरची बस पकडून सरळ गेट वे ऑफ इंडिया ला उतर. तेवढं बघितलंस तरी अर्धी मुंबई बघितल्यासारखं आहे.
होय सर म्हणून मी आनंद आणि उत्सुकतेने साहेबांनी सांगितल्यानुसार गेट वे ऑफ इंडिया ला गेलो. तेव्हाचा आनंद आठवून आजही मला साहेबांची खूप कृतज्ञता वाटत राहते.
पहिल्यांदा मुंबई आणि गेट वे ऑफ इंडिया, ताजची भव्यता, सकाळी साडेदहाची वेळ असूनही माणसांची वर्दळ, माझ्यासाठी हे सगळं खूप अप्रूप होतं.
योगायोग म्हणजे त्या दिवशी माझा वाढदिवस होता. ताजच्या समोर उभा राहून एक फोटो घेतला. साठ रुपये लागले!
तासभर जिवाची मुंबई करून पुन्हा माघारी बालभवनला गेलो. चहांदे साहेब आले होते. साहेबांनीच त्यांना माझ्याबद्दल माहिती दिली. चहांदे साहेबांनी हलकसं हसत माझ्याकडं 'वा, छान' अशा नजरेनं पाहिलं. मी परवानगी घेतली आणि प्रकल्प संचालक कार्यालयाच्या पायऱ्या उतरून खाली आलो.
तेव्हाचं साहेबांचं मातृरूप मला आजही जसंच्या तसं आठवतं. एका सामान्य शिक्षकाला राज्याचे उपसंचालक इतक्या मायाळूपणे वागवतात हे खूप आश्चर्यकारक होतं माझ्यासाठी.
साहेबांमुळं मला मुंबईचं वैभव पाहता आलं. त्यांच्यासोबत चहा घेता आला. 
आज साहेब गेल्याची बातमी कळली आणि काळजात चर्र झालं.
एक देवमाणूस आपल्यातून निघून गेला...

विनम्र श्रद्धांजली...


सोमवार, ९ मे, २०२२

भटकंतीचा नाद...

 भटकंतीचा मला भारी नाद. मोटारसायकलवर म्हटल्यावर तर काय मग!  आधी ग्रुपने ठरलं. पण मग 'टू इज कंपनी, थ्री इज क्राऊड' या 'वपुं'च्या विधानानं एका गाडीवर दोघेच जायचं पक्कं झालं. कोयना ते गोवा - बेंगलोर- तिरुपती आणि परत कोल्हापूर गडहिंग्लज. तब्बल अडीच हजार किलोमीटर.

नांदेडहून मी बसने पोफळीला आलो. पोफळी-कोयनेहून आम्ही हिरो होंडा सीडी हंड्रेडवर निघालो. मी आणि अण्णा, दत्तात्रय यरनाळ, मित्राचा मोठा भाऊ. दोन बॅगा, एक करियरवर एक करियरखाली लटकवून. डिकीत जुजबी सामान. पाणी बाॅटल, टाॅवेल, बेडशीट, स्लीपर्स असं. दोघांनाही हेल्मेट, गाॅगल, विन्डचिटर,शूज. गळ्यात कॅमेरा अन हातात भारताचा मॅप!

आपण काहीतरी भन्नाट करतोय या जाणिवेनं उत्साहाने आम्ही निघालो होतो पण काय होईल कसं होईल ही धास्ती होतीच.

अण्णा भारी फिरस्ता. गाठीला मोठा अनुभव. भूगोलासोबत इतिहासातही त्याला रुची. चांगलंच सूत जुळलं.
पहिला टप्पा गणपतीपुळे. पण वाटेत चांगलं बघत जायचं हे ठरलेलं. आलटून पालटून आम्ही चालक व्हायचो. मागे बसणाऱ्यानं मॅप काढून रस्ता स्धळं शोधून ठेवायचं. खेडचे गरम पाण्याचे झरे आणि वालावलकर ट्रस्टची शिवसृष्टी पाहूनच चैतन्य आलं. तिथल्या घोड्याना हात लावून पाहिला मी तर, इतके जिवंत पुतळे! गणपतीपुळ्याला जाताना वाटेत झाडाचे काजू  खाल्ले. चोरून. आयुष्यात पहिल्यांदा काजूचं झाड पाहिलं.

गणेशदर्शन झाल्यावर सूर्यास्तावेळी अण्णा म्हणाला, व्यंकट ते बघ समोर आफ्रिका दिसतंय. मीपण वेड्यागत बघत राह्यलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून गोव्याला प्रस्थान. मोटारसायकलवर गोव्यात येतोय याचं अप्रूप मलाच माहीत!
आम्ही थांबलो त्या हाॅटेलच्या बाजूला पाॅप सिंगर रेमो फर्नांडिसचं घर. वेटरनं दाखवलं आम्हाला. रात्री मुक्कामाला पोचलं की थोडा घसा गरम करून आडवं व्हायचं हा नियम.
तिसऱ्या दिवशी अख्खा गोवा आम्ही बाईकवर पालथा घातला. मंगेशीत बकुळीची फुलं घेतली. गोवा मागे पडलं तसं दक्षिणी केशसंभारसमृद्ध पाहून माणसात आल्यासारखं झालं.

सकाळी  कारवार मार्गे शिमोगा. कुमठा गेल्यावर सिद्धापूर जंगलातून जाताना रात्र झाली. डावीकडे कडा अन उजवीकडे गडद दाट झाडी. वर फक्त आकाश. एक दोन चांदण्या सोबतीला. आम्ही एकदम चूप. माणसाच्या अस्तित्वाची कसलीच खूण नाही. वाटलं, संपलं सगळं. घाट चढून वर गेल्यावर जंगलखात्याचा माणूस भेटला. म्हणाला, 'कशाला आलात या रस्त्यानं.  नशीबवान आहात. रात्री या रस्त्याने फक्त पोलीस येतात.' आम्ही वाचलो. तेव्हा म्हणे वीरप्पन फिरायचा तिथे.

शिमोग्याला मुक्काम करून सकाळी श्रवणबेळगोळला निघालो. वाटेत गाडी पंक्चर झाली. मी लिफ्ट घेऊन पुढे अन अण्णा टाकीवर बसून गाडी घेऊन आला. एका दमात तो पहाड चढलो आम्ही. सकाळी मात्र बेंगलोरात मांड्याला गोळे येऊन दिवसभर अंथरुण धरलं.

सहाव्या  दिवशी तिरुपती बालाजी दर्शन घेतले. गोविंदपट्टणच्या वाहतूक पोलीसांनी जीव खाल्ला. एमएच 23 ची गाडी. त्यांना वाटलं आम्ही चोरून आणलीय. अखेर एसपीचा नंबर दे म्हटल्यावर शुद्धीवर आले. तिरुपतीला मुक्काम करून वापस बेंगलोरला अक्काकडे थांबून परतीच्या प्रवासाला निघालो. एका दिवसात सुमारे साडेपाचशे किलोमीटर अंतर पार करून कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यात नौकुडला पोहोचलो. सकाळी सातला निघाल्यावर नौकूडला पोचायला रात्रीचे अकरा वाजले होते. नौकुड अण्णाची सासरवाडी. तो तिथेच थांबला. सकाळी मी कोल्हापूर सांगली लातूर करत नांदेडला रात्री उशिरा पोचलो.

आजही उन्हाळ्यात केलेल्या या भन्नाट प्रवासाची जेव्हा कहाणी सांगतो तेव्हा मित्र विश्वास ठेवत नाहीत. मलाही या आमच्या अविश्वसनीय टूरचं तहहयात अप्रूप वाटत राहतं.

दत्ताची आठवण

दत्तात्रय हेलसकर... साने गुरुजी कथामालेसाठी आयुष्य समर्पित केलेला जिव्हाळ कार्यकर्ता शिक्षक.... ५ सप्टेंबर २०१५ रोजी शिक्षक दिनी...